बाळकृष्ण भोईर : एक लढवय्या आणि निस्वार्थ पर्वाचा शेवट
प्रभात पर्व न्यूज - Published: 19-Nov-2023 12:26 pmगावाची एकी आणि सामाजिक प्रगती व्हावी यासाठी स्वर्गीय बाळकृष्ण कोळू भोईर ( पेणधर) यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अथक प्रयत्न केले. महाराष्ट्र शासन तंटा मुक्त गाव समितीच्या पेणधर विभागाचे ते अध्यक्ष होते. सर्वांना एकसंघ करुन गावचे सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सिडको आणि संबंधित शासकीय प्रशासनाला जेरिस आणले होते.
विस्तारित गावठाणातील घरांना जमीन मालकी मिळावी म्हणुन गावठाण चळवळ बळकट करणेसाठी "परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था" उभारणी मध्ये मोलाचे सहकार्य स्वर्गीय बाळकृष्ण भोईर यांनी केले. सामुहिक वर्गणी काढून न्यायालयीन लढाई लढले, गावोगावी सभा घेतल्या. स्वतःचे आजारपण आणि डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला बाजुला ठेवून गावठाण चळवळीचे प्रमुख सल्लागार या नात्याने अथक परिश्रम करत होते. वरिष्ठ नागरिक असून देखील गावातील तरुण मुलांपेक्षा जास्त जोमाने आणि स्फुर्तीने सामाजिक चळवळ गावो गावी सभा घेऊन पोहचवत होते, जनजागृति करत होते. कोणत्याही प्रकारची वैयक्तिक अपेक्षा अथवा स्वार्थ नसणारे बाळकृष्ण कोळू भोईर सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्हाला सोडून गेले. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे "सल्लागार" आज आमच्यामध्ये नाही याचे दुःख आम्हा सर्वांना आहे.
ग्राम समिती - पेणधर तर्फे बाळकृष्ण कोळू भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली काही प्रश्न हाती घेतलेले आहेत.
१. घोट नदीच्या अलिकडील विभाग आणि कोकण रेल्वे लाइन च्या आत असलेला विभाग, पेणधर गाव, तळोजा फेज -2 या सर्वांचा मिळून "पेणधर नोड" असे नामकरण व्हावे.
२.पेणधर गावासाठी स्वतंत्र समाज मंदिर, खेळाचे मैदान इत्यादि सामाजिक सोई सुविधा मिळाव्या.
३. गावातील सिडको तर्फे अवॉर्ड न झालेल्या जमीनी तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक वाढिपोटी केलेल्या बांधकामाखालील जमीनी शासनाकडून सोडवून घेणे.
४. गावाच्या सिडको संपादित जमिनींवर होणाऱ्या विकास कामांमध्ये जमीन बाधित शेतकऱ्याला पुनर्वसनाचे अधिकार मिळावे.
तसेच गावाची एकी टिकून रहावी अशा प्रकारची इच्छा स्वर्गीय बाळकृष्ण भोईर यांची होती. यासाठी त्यांनी त्यांच्या परिने होईल तितके कष्ट आणि मेहनत वरील विषयी मार्गी लावण्यासाठी घेतली, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते यासाठी प्रयत्नशील राहिले. आज एक निस्वार्थी लढवय्याचा पर्व संपला पण त्यांना खरी आदरांजली द्यायची असेल तर फक्त त्यांचे दुखवट्याचे बॅनर लावून नाही तर त्यांचे राहिलेले काम पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी सुरु केलेला सामाजिक लढा आणखी बळकट केला, शासकीय यंत्रणेला सामाजिक प्रश्न मार्गी लावायला भाग पाडले तरच ती स्वर्गीय बालकृष्ण कोळू भोईर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था आणि ग्राम समिती - पेणधर तर्फे आम्ही सदैव स्वर्गीय बाळकृष्ण भोईर यांनी दिलेला समाज कार्याचा वसा जोपासु, अपुरे कार्य पुर्णत्वास नेऊ.
किरण पाटील - अध्यक्ष परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था आणि ग्रामसमिती पेणधर