वनमंत्री गणेश नाईक यांच्या मध्यस्थीनंतर १७ मे रोजीचे महाविकास आघाडीचे पाणी आंदोलन स्थगित
नवी मुंबई : पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी १७ मे रोजी कामोठे येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आज (शुक्रवार दि..१५ मे) रोजी संबंधित प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिली.
पाणी प्रश्नासंदर्भात पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर मुंबईतील मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिन्ही प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पनवेल शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्याचे अरविंद म्हात्रे यांनी सांगितले. त्यानुसार, महाविकास आघाडीच्या वतीने दि. १७ मे रोजी कामोठे येथे होणारे आंदोलन तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहे. या बैठकीस महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक तथा शेकापचे चिटणीस प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक राम पाटील उपस्थित होते. तसेच सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी कांबळे, विलास चौतालिया, पनवेल महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
.