गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व

🕒 22-07-2026 04:14 AM | Prabhat Parv News

         आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस ! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक अन् शिष्‍य यांच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरूंच्‍या कृपेने शिष्‍याचे परममंगल होते म्‍हणजेच त्‍याची आध्‍यात्मिक उन्‍नती होते. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुतत्त्व नेहमीच्या तुलनेत १ हजार पटींनी कार्यरत असते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचा उद्देश आणि महत्त्व, गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत याविषयी पहाणार आहोत.

गुरूंचे महत्त्व : गुरुदेव ते आहेत, जे साधना सांगतात, साधना करून घेतात आणि आनंदाची अनुभूती देतात. गुरुंचे लक्ष शिष्याच्या भौतिक सुखाकडे नसून, केवळ त्याच्या आध्यात्मिक उन्नतीकडे असते. गुरुच शिष्याला साधनेसाठी प्रेरणा देतात, टप्प्याटप्प्याने साधना करून घेतात, साधनेत येणारे अडथळे दूर करतात, साधनेत स्थिर ठेवतात आणि त्याला परिपूर्णतेकडे घेऊन जातात. गुरुंच्या संकल्पाशिवाय इतके मोठे आणि कठीण शिवधनुष्य उचलणे अशक्य आहे. याउलट, गुरुंची प्राप्ती झाल्यास हे कार्य सहज शक्य होते.


श्री गुरुगीतेमध्ये ‘गुरु’ या संज्ञेची उत्पत्ती पुढीलप्रमाणे वर्णन केली आहे :

गुकारस्त्वन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते ।

अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ।। — श्री गुरुगीता


अर्थ : ‘गु’ म्हणजे अंधार अथवा अज्ञान आणि ‘रु’ म्हणजे तेज, प्रकाश किंवा ज्ञान. अज्ञानरूपी अंधकार दूर करणारे ब्रह्म म्हणजे गुरुच होत, यात कोणताही संशय नाही. यावरून साधकाच्या जीवनात गुरुंचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे लक्षात येते. म्हणून गुरुची प्राप्ती हेच साधकाचे पहिले ध्येय असते. गुरुची प्राप्ती झाल्यानेच ईश्वरप्राप्ती होते; किंवा असे म्हणता येईल की, गुरुची प्राप्ती होणे म्हणजेच ईश्वरप्राप्ती होय. ईश्वरप्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती, आणि मोक्षप्राप्ती म्हणजे अखंड आनंदावस्था. या अवस्थेपर्यंत गुरुच आपल्याला पोहोचवतात. शिष्याला जीवनमुक्त करणाऱ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.


गुरुपौर्णिमेचा उद्देश आणि महत्त्व

गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ हजार पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्याची पद्धत

सर्व संप्रदायांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. येथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, गुरु हे एक तत्त्व आहे. गुरु देहरूपाने जरी वेगवेगळे दिसत असले, तरी गुरुतत्त्व एकच असते. विविध संप्रदायांबरोबरच अनेक संस्था, संघटना आणि पाठशाळांमध्येही गुरुपौर्णिमेचा महोत्सव अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. गुरुपूजनासाठी चौरंग पूर्व–पश्चिम दिशेला ठेवावी. शक्य असल्यास चौरंगावर लघुमंडप उभारण्यासाठी केळीचे खांब किंवा केळीची पाने वापरावीत. गुरुंच्या प्रतिमेची स्थापना करण्यासाठी लाकडी देवघर किंवा चौरंगाचा उपयोग करावा. पूजन करताना आपल्या समोर प्रत्यक्ष सद्गुरु विराजमान आहेत, असा भाव ठेवावा. सर्वप्रथम श्री महागणपतींचे आवाहन करून देशकाल कथन करावे. त्यानंतर श्री महागणपतींचे पूजन करून विष्णुस्मरण करावे. त्यानंतर सद्गुरु, म्हणजेच महर्षी व्यास यांचे पूजन करावे. त्यापुढे आदि शंकराचार्य इत्यादींचे स्मरण करून, आपल्या संप्रदायाच्या परंपरेनुसार आपल्या गुरुंच्या गुरुंचे पूजन करावे. या वेळी गुरुंच्या प्रतिमेचे किंवा पादुकांचे पूजनही केले जाते. त्यानंतर आपल्या गुरुंचे पूजन करावे. 

गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श : जेव्हा धर्माला ग्लानी आली, तेव्हा धर्मसंस्थापनेचे कार्य गुरु-शिष्य परंपरेने केले आहे. ही दैवी परंपरा केवळ गुरु आणि शिष्य, अध्यात्म अन् मोक्ष यांच्यापुरती मर्यादित नाही, तर विश्वकल्याणासाठी प्रवाहित आहे. गुरु-शिष्य परंपरेने केवळ शिष्याच्या जीवनाचे कल्याण केले आहे, असे नाही, तर धर्मसंस्थापना आणि राष्ट्ररक्षण यांचेही कार्य केले आहे. आजही परमकल्याणकारी गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी, तसेच भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. आपले कर्तव्य हे आहे की, एक व्यक्ती म्हणून केवळ कुटुंबापुरता विचार न करता राष्ट्र आणि धर्म कार्यामध्ये स्वतःला झोकून देणे ! आज आपण गुरु-शिष्य परंपरेच्या प्रवाहात सामावून जाण्यातच आपले हित आहे.


संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ आणि 'गुरुकृपायोग'


संपर्क :

श्री. श्रीकृष्ण उपाध्ये 

98192 42733

सनातन संस्था

Leave a Comment

Comments

गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026
रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा
21 Jun 2026
तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
19 Jun 2026
नैना क्षेत्रातील ९५ गावांचे अभिलेख पनवेलकडे परत करण्याचे आदेश; हस्तांतरण प्रक्रिया मात्र प्रलंबित
17 Jun 2026