अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापालिका प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून बाधित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आतापर्यंत ४३५ नागरिकांचे चार तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भारतनगर झोपडपट्टीतील १४९ नागरिकांना उर्दू शाळेत, २११ नागरिकांना कोळीवाडा शाळेत, तर एचओसी कॉलनी आदिवासी वाडीतील ७५ नागरिकांना क्रीडा संकुलात हलविण्यात आले आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जेटिंग मशिन, जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने गटारे व नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू असून खारघर ड्रायव्हिंग रेंज आणि पांडवकडा मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित अधिकारी सातत्याने पूरग्रस्त भाग व निवारा केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
महापौर नितीन पाटील यांनीही पाणी साचलेल्या भागांची आणि निवारा केंद्रांची पाहणी करून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. दरम्यान, आयुक्त मंगेश चितळे यांनी ऑनलाईन बैठकीत सर्व प्रभागांतील परिस्थितीचा आढावा घेत महापालिकेची संपूर्ण यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.