आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन
ठाणे : आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते व आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन झालं आहे. आगरी समाजासह विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. समाजहितासाठी आयुष्यभर कार्य करणारे आणि आगरी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
१ ऑगस्ट १९८६ रोजी स्थापन झालेल्या आगरी सेनेचे प्रमुख म्हणून राजाराम साळवी यांनी कोकणासह महाराष्ट्रातील आगरी समाजाला संघटित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने कार्य करत समाजातील विविध प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडले. आगरी समाजाच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने, जनजागृती मोहिमा आणि संघटनात्मक उपक्रम राबवले.
कामगार नेते म्हणूनही त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भक्कम भूमिका घेतली. महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी महामंडळाचे पहिले अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) म्हणून काम करताना त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रमांना चालना दिली. समाजकारण, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यांच्या बळावर त्यांनी आगरी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
राजाराम साळवी यांच्या निधनामुळे आगरी समाजाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याच्या भावना समाजातील मान्यवर, कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.