विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शेकापचे अरविंद म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : १८ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या समर्थकांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अरविंद म्हात्रे यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेतील गटनेते केतन भगत, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, तुषार पाटील, युवा नेते शेखर शेळके, कर्नाळा टिव्हीचे संपादक हरीश मोकल इत्यादी मान्यवरांसह शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही विधानपरिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, अरविंद म्हात्रे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष जरी छोटा पक्ष असला तरी पक्षाची ताकद काय आहे, हे आम्ही माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या विजयाच्या निमित्ताने त्याचबरोबर शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या विजयाच्या निमित्ताने आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना सुद्धा, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा पराभव केला होता. अशा रीतीने अनेक वेळा दाखवून दिले आहे.
अरविंद म्हात्रे पुढे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष हा इतिहास घडवणारा पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा आम्ही चमत्कार करून दाखवू. सुनील तटकरे यांच्या करिष्म्याबाबत आणि अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीबाबत त्यांना छेडले असता, ते पुढे म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा लढवय्या आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अंगीकारताना उंबरखिंडीत भल्या मोठ्या संख्येने स्वराज्यावर चालून आलेल्या गनिमांचा नि:पात केला होता आणि विजय संपादन केला होता. त्याप्रमाणे आम्हीही ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केला.