खारघरमधील पाणीटंचाईच्या संदर्भात माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना पत्र
प्रभात पर्व न्यूज - Published: 11-Mar-2025 03:45 pm
खारघर : माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनीखारघर शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील बहुतांश सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी दोन ते तीन दिवस पाणीच येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याचा अपुरा पुरवठा आणि वाढती गरज यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, मात्र त्याचा आर्थिक भार सामान्य नागरिकांना सहन होण्यासारखा नाही.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने भूखंड विक्रीला गती दिली असून, अनेक खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठमोठ्या इमारती उभारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या वाढत्या वसाहतींना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा विचारच केला जात नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. रहिवाशांनी वेळोवेळी सिडकोकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पत्रव्यवहार केला, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. सेक्टर १९ आणि सेक्टर २१ मधील काही सोसायट्यांना तर वर्षभर कमी दाबानेच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी याविषयी वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
नुकताच मार्च महिना सुरू झाला असून मागील आठवड्याभरापासून सिडकोचे पाणी कमी दाबाने येत आहे किंवा काही वेळा पूर्णतः बंद राहत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याआधीच ही स्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होईल, असा इशारा नेत्रा पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे दिला आहे.

