प्रबोधन आणि भक्तीचा संगम हरवला; ज्येष्ठ किर्तनकार ह.भ. प. पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे निधन
प्रभात पर्व न्यूज - Published: 05-Jan-2025 04:36 pm
पेण : ज्येष्ठ किर्तनकार ह.भ. प. पुरूषोत्तम महाराज पाटील (धाटाव, रोहा) यांचे शनिवारी ( दि. ४ जानेवारी) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी धाटाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यांना आवडीने 'बापू' या नावानेच संबोधले जात होते. अंत्यविधीसाठी दुपारी त्यांचे पार्थिव मूळ गावी म्हणजे पेणमधील डोलवी येथे आणण्यात आले होते. यावेळी निरोपचं किर्तन संपन्न झालं. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पनवेल, पेण, वडखळ, रोहा, सुधागड, खालापूर, कर्जत या विविध विभागातून त्यांचे अनुयायी तसेच वारकरी सांप्रदायाचे प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रासह पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांच्या अचानक जाण्याने वारकरी सांप्रदायावर मोठा आघात झाला असून वारकरी सांप्रदायाचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
रोहा तालुक्यातील बाळसई गावातील हरिनाम सप्ताहात ३ जानेवारी रोजी पुरूषोत्तम महाराजांची किर्तन सेवा होती. तेथील किर्तन सेवा झाल्यानंतर ते रात्री १२.३० वा. धाटाव येथे आपल्या घरी गेले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) सकाळी बापू उठत नाहीत म्हणुन त्यांच्या घरातील त्यांना उठवण्यासाठी गेले पंरतु त्यांच्या शरीराकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना रोहा येथील डॉ. अशोक जाधव यांच्या दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती तिथे पोहण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा जन्म १ ऑगस्ट १९५३ रोजी वडखळ जवळ डोलवी (पेण) येथे झाला. कामानिमित्त धाटाव येथे आले असता त्यांनी सुदर्शन केमिकल लिमिटेड या कारखान्यात अनेक वर्षे सेवा केली. गुरुवर्य नामदेव बाबा डोलवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी प्रबोधनाला सुरुवात केली. सुदर्शन कंपनीत काम करीत असताना आपल्या अनोख्या शैलीतील किर्तनाने समाजप्रबोधनाचं कार्य केलं. कीर्तन, भारूडे, गवळणी व रामायण कथा यासह ज्ञानेश्वरी ग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. धाटावमधे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता. गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार, वर्धापनदिन त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन, संयोजन त्यांच्याच नेतृत्वाखाली केले जात असत. गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्गाला ते विशेष मार्गदर्शन करीत असत. आळंदी येथे कोकण दिंडीच्या माध्यमातून वारकरी वर्गासाठी धर्मशाळा बांधण्याची त्यांची संकल्पना होती. त्यांच्याच मार्गर्शनाखाली उभारलेली ही वास्तू पूर्णत्वास येत आहे. त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अचानक जाण्याने 'प्रबोधन आणि भक्तीचा' संगम हरवला आहे. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत..!