फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभारामुळे तरुणाची आत्महत्या
प्रभात पर्व न्यूज - Published: 08-Dec-2024 10:12 am
उरण : उरण तालुक्यात करंजा येथे 'एमएएस फायनान्स' कंपनीच्या मनमानी कारभारामुळे प्रथमेश देसाई या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी घडली. प्रथमेश याने वेळेवर हप्ते भरूनही कंपनीकडून सतत धमक्या आणि मानसिक छळ सहन करत अखेर गळफास लावून जीवन संपवले. दरम्यान या प्रकरणी ईडीआर दाखल केला असून सदर घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली आहे. जर या घटनेत फायनान्स बँक किंवा फायनान्सचे कर्मचारी दोषी असतील तर निश्चित त्यांच्यावर कायदेशीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
प्रथमेश देसाई याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७५,६०८ रुपये भरण्यात आले असून केवळ ३२,०८६ रुपये बाकी होते. मात्र, कंपनीच्या एजंटांनी घरातून गाडी जबरदस्तीने नेली आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याने त्याच्या मनावर मोठा आघात झाला. या प्रकारामुळे देसाई कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रथमेशच्या आई-वडिलांनी कंपनीच्या कर्मचारी आणि संचालकांवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडून धमकीचे फोन येत होते, तसेच मोठ्या भावाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
आरबीआयने कर्जवसुलीसाठी नवीन नियम जारी केले असले तरी एमएएस फायनान्सकडून त्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबांची अवस्था आणि बँकांच्या मनमानी कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.